लहानपणापासून जे होतं उराशी बाळगलं...
आवंढा गिळुनही, कधी ओठी नाही आलं...
कधी धाकाने ठेचलं, कधी पैशाने चिरडलं...
खरंच मला कधी मनासारखं नाही होता आलं...
कधी कुणी नाकात माझ्या, समाजाचं वेसण घातलं...
लोक काय म्हणतील सांगत संस्कृतीनं खोलीत डांबलं...
का शेजारचं पोर गेलं म्हणून मलाही इंग्रजी शाळेत घातलं?...
मनातलं फुलपाखरू उडण्याआधीच त्याचं butter fly झालं...
इंजिनिअर नाहीतर डॉक्टर, सगळं आधीच फिक्स झालं...
याहून काही वेगळं केलं म्हणजे पोर अगदी कामातून गेलं...
चार पैसे कमावत नाहीतोवर इतर सांगतील मी तेच केलं...
आता खरी सुरुवात करू म्हटलं, अन त्याच क्षणी लग्न जमलं...
बायकोला सांगितलं, तर ती म्हणाली तिने हि आजवर हेच केलं...
त्याच वेळी, 'तू तुला हवं ते कर' असं एकमेकांना वचन दिलं...
माझ्या स्वप्नांचे पंख लावून मी तिला आकाशात उंचच उंच नेलं...
पण पाळण्यातल्या रडण्याचा आवाजाने सारं पुन्हा जमिनीवर आलं...
कामाच्या व्यापातून कळलेच नाही कधी माझं स्वप्न माझ्या मुलांचं झालं...
आरशात पाहिलं अन लक्षात आलं आता आपलं वय होत आलं...
तुझ्या मुलांचही तेच होईल का, जे आजवर तुझं झालय?...
आणि तुझं हि तेच होईल का, जे तुझ्या आई-बाबांचं झालंय?...
मुळीच नाही,
कारण घरातल्या साऱ्यांना मी ह्या बंधनातून केव्हाचं मुक्त केलंय...
वयाचा विचार न करता,
प्रत्येकाला उराशी एक स्वप्न बाळगायला सांगितलंय...
~ अरुण भऊड
No comments:
Post a Comment