Saturday, February 7, 2015

अक्षराय


स्वप्नात एकदा एक कवी आला, 
ओंजळीत होती त्याच्या काही पोरकी अक्षरे 
देवच गेला त्यांना टाकून कवीच्या पदरात, 
जाताना म्हणाला "नीट काळजी घे बरे."

कवीच तो, मग काय विचारता,
सगळ्या अक्षरांशी त्याने केली ओळख-पाळख… 
टोचली लस लेखणीची, लावले वळण,
अन मिळवून दिली त्यांना एक नवीन ओळख. 

प्रत्येक अक्षर निराळे, त्यांची निराळीच ढब,
प्रत्येकाचे निराळेच वळण, तरी कागद हेच त्यांचे वलय … 
वळण जरी नसले एक तरी शिकवण मात्र होती एक,
कवी सोबत वाढताना, अक्षरांना उमगली  होती एक लय. 

हळूहळू मोठे होताना, त्यांना फुटू  लागले "शब्द",
कवीच्या परीसस्पर्शाने त्यांना प्राप्त झाले "अर्थ". 
त्याने केली गुंफण अक्षरांची, ठेवला त्यांवर अंकुश,
अनर्थांच्या शब्दांना कधी फुटलेच नाहीत  अंकुर.

कवीची इतक्या वर्षांची मेहनत,
अक्षरांवरचे त्याचे निर्मळ प्रेम, त्याने केलेले संस्कार… 
यातूनच पैलू पडल्या पाचूसामान,
आकार घेत होते कवीच्या मनातले सुंदर "विचार"!

अक्षरांचे बनले 'शब्द', 
शब्दांपासून बनल्या 'ओळी',
ओळींपासून बनली 'कडवी', अन एक-एक कडवं मिळून … 
जन्मली एक सुंदर "कविता".

कविताही इतकी सुंदर,
इतकी कोमल आणि निरागस,
कि देवालाही आवरला नाही मोह, तिला  उचलून कडेवर घेण्याचा …
कधी कधी एक कविताही पुरते, प्रसन्न करण्या देवाला.

कवीला आशीर्वाद देत, देव म्हणाला ,
"तू होतास कवी, 
म्हणून पदरी पडली एक ओवी ,
तू असता गुंड वा  मद्यपी,
नशिबी आली असती एक शिवी ."

देवाचे आभार मानून कवी वदला,
"अक्षरे तीच मात्र विचार भिन्न-भिन्न,
जरा तोल ढळता, होतो अर्थाचा अनर्थ.
अक्षरांचे शब्दही बनतात, अन बनतात अपशब्द ,
कधी ती घडा-घडा बोलतात तर कधी होतात निःशब्द. 

अक्षरे प्रेमाने उजळवतात, जीवनात असंख्य वाती,
तीच कधी मत्सर बनून येतात, अन तुटतात नाती . 
विचारांचे सुंदर ओहोळ, कधी वाहतात होऊन सांडपाणी ,
कधी देतात हर्षवायू , तर कधी आणतात डोळ्यांत पांणी . 

अक्षरे तीच मात्र आचरण निराळे, शिक्षण निराळे,
परिश्रम निराळे, वृत्ती निराळी आणि त्यांचे स्थानही निराळे. 
ओंजळीत घेत अक्षरे दोन, हात जोडून कुणी म्हणतो 'राम ',
तीच अक्षरे पिस्तुलात ठासून, छातीवर रोखत कुणी म्हणतो 'मरा'. 

अक्षरांना नाही कोणताच धर्म, ती पाळत नाहीत कोणतीच 'जात',
त्यांना नाही कोणत्या सीमा म्हणून शस्त्र घेऊन लढायलाच नाही जात . 
हेवे दावे नाही कि कुठलाच अहंकार नाही , केलीच नाही कधी हिंसा,
पेरावी तशी उगवतात म्हणूनच जगायला लागत नाही कधी पैसा . 

अक्षरे असली जरी कवडीमोल ,
त्यांचे अर्थ आहेत कितीतरी अनमोल,
आपल्यासाठी पृथ्वी असेल नुसतीच गोल ,
पण अक्षरांना भासते ती कितीतरी खोल. 

अक्षरांना जेव्हा दिले प्रेम तेव्हा ती प्रेम करायला शिकली 
एकीचे बळ मिळाले तेव्हा ती नाती जपायला शिकली ,
नंतर त्यांची ती आपसूकच जुळत गेली,
आणि मला एक सुंदर कविता सुचली !"

इतक्यात मला आली जाग, आले भान सभोवतालचे,
स्वप्नातच दीक्षा मिळाली आणि जाणीव झाली… 
देवाने माझ्याही पदरात टाकले आहे दान "अक्षरा" चे
चाहूल लागली मला पण, मी एक बाप झाल्याची … 

'कवीने दिली माया अक्षरांना एका बापाची ,
आता एक बाप देईल माया 'अक्षरा' ला एका कवीची!'

                                                                   ~ अरुण भऊड 


No comments:

Post a Comment